
पुणे, :
दापोडी फुगेवाडी परिसरातील आनंदवन कृष्ठवसाहतीमध्ये राहणाऱ्या सुमारे ९० ते १०० अपंग, कृष्ठपीडीत व विधवा लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार पेन्शन योजना नोव्हेंबर २०२४ पासून बंद करण्यात आली आहे. यामुळे या आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल घटकांवर उपासमारीची वेळ आली असून, त्यांच्या दैनंदिन जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पूर्वी दरमहा ६० रुपये असलेली ही पेन्शन सध्या १५०० रुपये इतकी आहे. मात्र, विविध कारणे सांगून या गरजू लाभार्थ्यांना पेन्शनपासून वंचित ठेवले जात आहे. आधारकार्ड मोबाईल नंबर लिंक नसणे, संपूर्ण जन्मतारीख नसणे, बँक खात्याशी आधार लिंक नसणे अशा अनेक तांत्रिक अडचणी दाखवत प्रशासनाच्या वतीने उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.
निगडी आणि पुणे तहसील कार्यालयाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. या लाभार्थ्यांमध्ये दृष्टिहीन, अपंग, वृद्ध, कृष्ठपीडीत आणि लाचार महिला आहेत ज्यांचं जीवन पूर्णतः या पेन्शन योजनेवर अवलंबून आहे.
स्थानिक प्रशासनाने या बाबतीत तातडीने लक्ष घालून, या गरजू नागरिकांना संजय गांधी निराधार पेन्शन योजना पूर्ववत सुरू करून त्यांना जीवनावश्यक आधार देणे आवश्यक आहे. अशी मागणी अनिल कांबळे.उपाध्यक्ष, नंदनवन कुष्ठ पिडीत बहुउद्देशीय संस्था, जितेंद्र चव्हाण. अध्यक्ष, महाराष्ट्र कुष्ठ पिडीत संघटना यांनी केली आहे. अन्यथा या घटकांचे जगणे असह्य होईल.