Spread the love

‘ हलगट ‘ १८ एप्रिलला प्रदर्शित होतोय!
मराठी चित्रपटसृष्टीत वेगळ्या धाटणीच्या कथांची उणीव असताना एक वेगळी, थरारक आणि हटके कथा घेऊन ‘कर्नन फिल्म्स प्रोडक्शन’चा नवा चित्रपट ‘हलगट’ १८ एप्रिल २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट गावाबाहेरच्या एका धोकादायक समुदायाची कथा उलगडतो. या टोळीचा क्रूर प्रमुख आणि त्याच्या विरोधात उभा राहणारा बंडखोर — या संघर्षाच्या छायेत एक नाजूक प्रेमकथा फुलते. लुटीचा खेळ, विश्वासघात, आणि सुटकेच्या प्रयत्नात सगळं काही बदलत जातं. शेवटी जे घडतं ते धक्का देणारं असतं, पण ते खरंच शेवट असतो का, की फक्त एका नव्या प्रवासाची सुरुवात? उत्तर अनुत्तरित राहतं…

‘हलगट’ची कथा जितकी जोरदार आहे, तितकंच त्याचं संगीतही प्रेक्षकांच्या मनाला भिडणारं आहे. चित्रपटात वेगवेगळ्या भावनांना उजाळा देणाऱ्या गाण्यांची मालिका आहे. चित्रपटाच्या पार्श्वसंगीतात प्रत्येक दृश्याला अधिक प्रभावी करण्याची ताकद आहे. विशेषतः शेवटच्या दृश्यात पार्श्वसंगीत, अभिनय आणि जिलबीचा धक्कादायक निर्णय या सगळ्याची सांगड प्रेक्षकांच्या मनात खोलवर ठसणार आहे.

चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक करण सुमन अर्जुन आहेत. हा चित्रपट कर्नन फिल्म्स प्रोडक्शन अंतर्गत साकारला असून, चित्रपटाचे निर्माते अण्णासाहेब बाबुराव घोंगडे, जीवन माधव लहासे, करण सुमन अर्जुन आणि हेमंत फकिरा अजलसोंडे आहेत. चित्रपटात मंगेश रंगनाथ कांगणे, अभिजीत कुलकर्णी, सुप्रिती शिवलकर, आणि अतिश लोहार यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. तसेच, विष्णू घोरपडे, गणेश आवारी, भूषण काटे आणि प्रदीप लडकत यांनी सहनिर्माते म्हणून भूमिका पार पाडली आहे. अभिजीत कुलकर्णी यांनी चित्रपटाची कथा आणि पटकथा लिहिली आहे. चित्रपटाची संपादन जबाबदारी संतोष घोटोसकर यांनी सांभाळली आहे. वेशभूषा प्रणिता हिंदुराव चिंदगे, तर मेकअप पूजा विश्वकर्मा यांनी केले आहे. जगदीश शेलार हे कला दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहेत, तर श्री दत्तात्रय मुसळे यांनी चित्रपटाची पब्लिसिटी डिझाईन केली आहे. श्रीनिवास राव यांनी DI कलरिस्ट म्हणून काम पाहिले असून, पार्श्वसंगीताची जबाबदारी अजिंक्य जैन यांनी सांभाळली आहे. गीतकार पद्माकर मालकापूरे, संगीतकार निलेश पाटील, आणि ध्वनी संयोजन स्वरूप जोशी व पोस्ट प्रोडक्शन लाइन प्रोडूसर जयेश मलकापूरे हे आहे. जीवन लहासे कार्यकारी निर्माता आहेत, तर अक्षय बोराटे यांनी प्रोडक्शन मॅनेजर म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी अमेय आंबेरकर यांनी PR सांभाळला आहे. पोस्ट प्रोडक्शन WOT स्टुडिओ येथे झाले असून, शिवा डिजिटल यांनी सोशल मिडिया मार्केटिंगची जबाबदारी घेतली आहे. चित्रपटाचा वितरण बॉक्सहिट मूव्हीज यांनी केला आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक करण सुमन अर्जुन यांनी या चित्रपटाबद्दल बोलताना सांगितलं, “हलगट ही केवळ एक कथा नाही, तर समाजातल्या एका दुर्लक्षित वर्गाचं कडवट वास्तव मांडण्याचा हा प्रयत्न आहे. बिबट्या आणि बाब्याच्या संघर्षामध्ये फक्त सत्तेची लढाई नाही, तर त्याच्या मुळाशी माणसाच्या आयुष्याला वळण देणाऱ्या परिस्थितींची लढाई आहे. जिलेबी या पात्राचं ट्विस्ट ही या चित्रपटाची खरी ताकद आहे. प्रेक्षकांनी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहायलाच हवा.”